सोमवार, ९ नोव्हेंबर, २००९

पक्ष्यांचे आवाज - श्री. शरद आपटे.

महाराष्ट्रातील पक्ष्यांचे श्री। शरद आपटे यांनी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन आधुनिक यंत्रणेच्या साहायाने टिपलेले अस्सल आवाज ... रंगीबेरंगी पक्षी आणि त्यांचे चित्रविचित्र आवाज आपलं चटकन्‌ लक्ष वेधून घेतात. आपण आपल्या परीनं पक्षांचे आवाज शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतो. कोकीळ पक्षाचा कुहू कुहू, पावश्याचा पेर्ते व्हा, शिंच्याचा च्युव्हिट्‌ च्युव्हिट्‌ किंवा तांबट्याचा पुक्‌ पुक्‌ ! पक्षांचे आवाज ओळखता आले, तर पक्ष्यांची ओळख तर पटेलच शिवाय त्यांच्या वागणुकीचे असंख्य कंगोरे दिसायला लागतात. पक्षी आणि प्राणी यांच्यातलं नातं उलगडतं. या ध्वनीफितीमध्ये महाराष्ट्रात दिसणार्‍या अनेक पक्ष्यांचे आवाज ध्वनीमुद्रित केले आहेत. हे आवाज श्री शरद आपटे यांनी आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने टिपले आहेत. त्यास अवश्य भेट द्या।

http://www.birdcalls.info/BetaApp/BetaApp.php

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २००९

एक अशी ही स्पर्धा ...

काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला.. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण... " डाउन्स सिन्ड्रोम 'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय? ' ' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता... त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात. का ? कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते..